
जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास : जालना जिल्ह्यातील सेवली ते नेर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल अक्षरशः शब्दात मांडता येणार नाहीत. “रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा सवाल आता प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येत आहे. या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की, वाहन चालवताना चालकांना प्रत्येक क्षणी अपघाताची भीती सतावत आहे. दुचाकीस्वार तर सर्वाधिक त्रस्त असून, अनेकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

दररोज शाळकरी विद्यार्थी, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, तसेच रुग्णवाहिका या मार्गावरून जात असतात. मात्र खड्ड्यांमुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे कठीण झाले आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी हा रस्ता अधिकच धोकादायक ठरत आहे.स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, “रस्ता दुरुस्तीचे काम फक्त कागदावरच होते का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
Facebook Channel Link https://www.facebook.com/share/v/14gYmPWpE8u/
तात्काळ उपाययोजना केली पाहिजे अशी नागरिकांच्या वतीने मागणी केली जात आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.





