
जालना (प्रतिनिधी) जिल्हा परिषद शाळा, भारज जिल्हा जालना येथील अवलिया शिक्षक दत्तात्रय गवळी सर यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या विदाई सोहळ्यात संपूर्ण गाव, विद्यार्थी व पालक भावूक झाले.
दत्तात्रय गवळी सर हे केवळ शिक्षक म्हणून नाही, तर आदर्श मार्गदर्शक, उत्कृष्ट कवी, व्यासंगी लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या सर्जनशील लेखनाने विचारांना दिशा दिली, कवित्वाने विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता जागवली, तर त्यांच्या वक्तृत्वाने प्रेरणा दिली.
विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान
दत्तात्रय गवळी सरांच्या शिकवणीमुळे केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर संस्कार, आत्मविश्वास आणि जीवनमूल्ये दृढ झाली. विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेले मार्गदर्शन म्हणजेच त्यांच्या आयुष्याचा दीपस्तंभ ठरले. गावातील प्रत्येक कुटुंबाने त्यांना आपले मानले.
पुरस्कारांची परंपरा : दत्तात्रय गवळी सरांच्या अभ्यासू वृत्तीचा व साहित्यिकतेचा गौरव म्हणून फक्त एका वर्षात नऊ जागतिक, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. या यशामुळे शाळा व गावाचे नाव दुरदुरापर्यंत पोहोचले.
विदाईचा भावनिक क्षण : समारोपाच्या दिवशी शाळेच्या पटांगणात हृदयस्पर्शी दृश्य अनुभवायला मिळाले. लहानग्या विद्यार्थ्यांचे हुंदके, पालकांच्या डोळ्यातले अश्रू आणि ग्रामस्थांच्या आर्त हाका यामुळे वातावरण भारावून गेले. “सर, आपण नका न जाऊ…!” ही विद्यार्थ्यांची आर्त हाक त्यांच्या कार्याचा खरा सन्मान ठरली.
खरी कमाई – समाजाचे प्रेम : ग्रामस्थांनी म्हटले – “दत्तात्रय गवळी सर हे आमचे अवलिया शिक्षक आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्ने रुजवली, त्यांना जीवनमूल्ये दिली. त्यांच्या जाण्याने गाव व शाळा रिकामी वाटत असली, तरी त्यांनी पेरलेली बीजे कायमसोबत राहतील.”
शुभेच्छांचा वर्षाव : विदाई सोहळ्यात सहकारी शिक्षक, पालक व गावकऱ्यांनी गवळी सरांना पुढील सेवास्थळी उत्तम आरोग्य, मान–सन्मान व आणखी शेकडो विद्यार्थ्यांच्या हृदयात अधिराज्य गाजवण्याच्या शुभेच्छा दिल्या.
“शिक्षकाचे पाऊल जिथे पडते तिथे ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून उमटलेले अश्रू म्हणजेच त्याच्या आयुष्याचा खरा सन्मान होय.”


विदाईचा क्षण – अवलिया शिक्षक दत्तात्रय गवळी सरांच्या बदलीने भारज गाव भावूक




